४० कोटीच्या कासारसिरसी अपर तहसील कार्यालय व कर्मचारी निवासस्थाचे भूमिपूजन संपन्न...

 ४० कोटीच्या कासारसिरसी अपर तहसील कार्यालय व कर्मचारी निवासस्थाचे भूमिपूजन संपन्न... 



औसा प्रतिनिधी 


औसा - कासारसिरसी च्या विकासासाठी महायुती च्या सरकारने भरीव निधी उपलब्ध करून दिल्याने अल्पावधीत कासारसिरसी विकासाच्या नकाशावर आले असून तालुका निर्मिती च्या अगोदरच अपर तहसील कार्यालयसह अन्य कार्यालये उभारले जात असून येणाऱ्या दोन वर्षांत एका प्रशासकीय इमारतीच्या माध्यमातून सर्वच कार्यालये उभारले जातील महाराष्ट्रात जेव्हा नविन तालुका निर्मिती केली जाईल तेव्हा अग्रस्थानी कासारसिरसी व किल्लारी तालुक्याची निर्मिती होईल अशी ग्वाही आमदार अभिमन्यू पवार यांनी दिली आहे. 


                 कासारसिरसी येथील ४० कोटीच्या कासारसिरसी अपर तहसील कार्यालय व महसूल कर्मचारी निवासस्थाचे भूमिपूजन प्रसंगी ते (दि.८) रोजी बोलत होते याप्रसंगी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डि बी निळकंट, उपअभियंता बांधकाम अनिता पाटील, गटविकास अधिकारी सोपान अकेले, अभियंता किरण पाटील, ए एम मुळजकर, सरपंच मोनाली ज्ञानेश्वर मडूळे, उपसरपंच विरेश चिंचणसुरे, कासारसिरसी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर वाकडे, महिला अध्यक्षा कविता गोरे, उप अभियंता लदाफ शखील आदीसह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते. आ अभिमन्यू पवार पुढे म्हणाले की कासारसिरसी च्या विकासामध्ये अनेकांनी अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र आपण मात्र सामान्यांचे आमदार आहोत याची जाणीव ठेवून सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून कासारसिरसी च्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून कासारसिरसीचा कायापालट करण्याचे काम केले असून या कामात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्री व प्रशासकीय अधिकाऱ्यांची मोलाची मदत झाली. येणाऱ्या काळातही कासारसिरसी विकासाची जबाबदारी माझी आहे. मागच्या काळात राज्य कर्त्यानी दुर्लक्ष केल्याने या भागातील विकासाचा अनुशेष निर्माण झाला आहे. मात्र आता शासनाच्या तिजोरीतून येणारा पहिला घास या भागातील विकासाला देण्यात येत आहे. या भागातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामे या काळात पुर्ण होत असून कासारसिरसी पाणीपुरवठा योजना, कोकळगाव बॅरेज, कासारसिरसी - कोराळी रस्ता आदी कामे मार्गी लागले आहेत. असे सांगून या सरकारने खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरणाचे काम केले असून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक आधार दिला आहे. येणाऱ्या काळात दिल्या जाणाऱ्या रक्कमेत वाढ होईल मात्र काही राजकीय लोकांकडून या योजनेबद्दल चुकीच्या अफवा पसरविण्याचे काम सुरू आहे. मात्र महायुती चे सरकार सर्व सामान्यांचे व शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे त्यांनी सांगितले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या