नागरसोगा येथे तरुण शेतकऱ्याची पेटवून घेऊन आत्महत्या शेतीमध्ये नुकसानीमुळे घेतला निर्णय

 नागरसोगा येथे तरुण शेतकऱ्याची पेटवून घेऊन आत्महत्या शेतीमध्ये नुकसानीमुळे घेतला निर्णय 


औसा - प्रतिनिधी 

          अवघी एक एकर शेती वृद्ध आई वडील त्यातही वडीलांची दृष्टी गेल्यामुळे ते अंध झाले आहेत. आशा परिस्थितीत शेतीमध्ये हि मोठे नुकसान झाले. त्यामुळे वैतागून बिभीषण पंढरीनाथ साळुंके (वय ३३) या तरुण शेतकऱ्याने रविवारी रात्री स्वतःच्या घरात जाळून घेतले होते. त्याला उपचारासाठी लातूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असताना सोमवारी पहाटेच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

             याबाबतची माहिती अशी कि नागरसोगा येथील बिभीषण पंढरीनाथ साळुंके यांनी शेतीमधील नुकसानीची धास्ती घेऊन स्वत:च्या राहत्या घरात रविवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पेटवून घेतले. त्याला उपचारासाठी तात्काळ लातूर येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.पण आगीचा भडका एवढा होता कि त्यांचे पूर्ण शरीर जळाले होते. त्यामुळे त्यांच्या शरीराने कुठल्याही उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

         मयत बिभीषण पंढरीनाथ साळुंके यांच्या पाठीमागे वृद्ध आई अंध झालेले वडील व विवाहित बहिण असा परिवार आहे. त्यांच्या नावे विविध कार्यकारी सोसायटीचे  कर्ज इतर खाजगी देणी असून शेतीमध्ये कांहीच निघालेले नाही. आता हे कर्ज फेडायचे कसे आणि वर्ष भागवायचे कसे या चिंतेत त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले अशी माहिती त्यांचे मेव्हणे तानाजी यादव यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या