जनता दरबारात प्राप्त तक्रारींचा पंधरा दिवसात निपटारा करा...

 जनता दरबारात प्राप्त तक्रारींचा पंधरा दिवसात निपटारा करा...





आ. अभिमन्यू पवार यांच्या प्रशासनाला सूचना


औसा प्रतिनिधी 


औसा - जनता दरबारात प्राप्त तक्रारी अर्जावर संबधीत विभागाने पंधरा दिवसांच्या आत कार्यवाही करून संबंधित प्रश्नाचा निपटारा करण्याच्या सूचना आ. अभिमन्यू पवार यांनी दिल्या आहेत. (दि.१८) जून रोजी औसा येथील आयोजित जनता दरबारात औसा तालुक्यातील नागरिकांच्या मंडळ निहाय अडचणी जाणून घेत जागेवरच अनेक विषय निकाली काढण्यात आले तर उर्वरीत लेखी तक्रारी अर्जांचा संबधीत विभागनिहाय अधिकाऱ्यांनी पंधरा दिवसांत निपटारा करण्याच्या आ. अभिमन्यू पवार यांनी दिल्या.


               यावेळी उपविभागीय अधिकारी अविनाश कोरडे, तहसीलदार भरत सूर्यवंशी, गटविकास अधिकारी युवराज म्हेत्रे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्ता गिरी,तालुका कृषी अधिकारी विकास लटूरे, बाजार समितीचे सभापती चंद्रशेखर सोनवणे, संगायो समितीचे अध्यक्ष काकासाहेब मोरे,सुनील उटगे, रोहयो समितीचे अध्यक्ष सदाशिव जोगदंड आदीसह विभाग व खातेनिहाय अधिकारी उपस्थित होते.यावेळी लाभार्थ्यांना शिधापत्रिका वाटप, सातबारा वितरण, भूकंपग्रस्त प्रमाणपत्र, संगायो योजनेचे लाभार्थी प्रमाणपत्र, कृषी विभागाकडून सोयाबीन बियाणे परमिट आदींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी आ. अभिमन्यू पवार यांनी मतदारसंघातील मजूर कामे लवकरात लवकर पूर्ण कराव्यात.पावसाळ्याचे दिवस असून काही ठिकाणी पोल पडणे, तारा तुटणे आशा प्रकारे घडले असून सदरील कामे लवकर पूर्ण करावे जेणेकरुन पोल अथवा पडलेल्या विद्युत तारेमुळे कुठलीही अनुचित प्रकार घडू नये तसेच शेतरस्ता संदर्भात मोजणी अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक यांचा एक चमू तयार करून त्या संबंधित अडचणी विधानसभा निवडणुक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी तातडीने सोडवाव्यात आशा सूचना प्रशासनास दिल्या. या जनता दरबारात कृषी, महावितरण, तहसील, बांधकाम विभाग,जलजीवन, शेतरस्ता, पंचायत समिती, शिक्षण विभाग आदीसह विविध विभागाच्या संदर्भात अर्ज प्राप्त झाले. 


              या जनता दरबारात प्रत्येक नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या याचबरोबर ज्यांना आपल्या तक्रारी या जनता दरबारात देता आल्या नाहीत त्यांनी आठवडा भरात लेखी स्वरुपात तक्रारी अर्ज तहसील कार्यालयात किंवा आपल्या संपर्क कार्यालयात देता येतील असेही सांगितले. तसेच संबंधित तक्रारदारांना त्यांच्या अर्जावर काय कार्यवाही केली यासंबंधी माहिती द्यावी आशा सूचना आ. अभिमन्यू पवार यांनी सांगितले.यावेळी मोठय़ा संख्येने तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या